Pune News : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, शहरातील सर्व खाऊ गल्ल्या, हॉकर्स, पान टपऱ्या, अंडा भुर्जी आणि चायनीजच्या हातगाड्यांसह सर्व अस्थायी आस्थापना रात्री 10 वाजेपर्यंत बंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील स्पष्ट आदेश जारी केले असून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे पुण्याची रात्रीची खाद्यसंस्कृती आणि उशिरापर्यंत सुरू राहणारे फूड स्टॉल्स यांना आता वेळेचे बंधन लागू होणार आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, फिरत्या स्वरूपातील हातगाड्या, खाऊ गल्लीतील स्टॉल्स, हॉकर्स आणि पान टपऱ्या यांना रात्री 10 वाजताच व्यवसाय बंद करावा लागणार आहे. मात्र स्थायी स्वरूपातील अधिकृत आस्थापनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाई करताना पोलिसांनी संयम बाळगावा, आस्थापनांमध्ये अनावश्यक प्रवेश करू नये आणि आक्षेपार्ह किंवा अरेरावीची भाषा वापरू नये, अशा सूचनाही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
रात्रीच्या वेळी होणारी अनावश्यक गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुण्यातील अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि पान टपऱ्या रात्री 10 नंतर बंद दिसणार आहेत.


