Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे मार्गावर झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजूला मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना वरपिता आणि वरमाय यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार असलेल्या तरुण-तरुणीचाही जागीच अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळजवळ हॉटेल वृंदावन परिसरात हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या एसटी बस आणि दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
व्यारा (गुजरात) येथील सुरेश महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे १९ जून रोजी लग्न होणार होते. त्याचबरोबर कुटुंबातील आणखी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आणि लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी महाजन कुटुंब अमळनेरकडे निघाले होते. मात्र, नियतीने वेगळेच काही ठरवले होते. या अपघातात सुरेश महाजन, अनिता महाजन, नंदलाल महाजन आणि निर्मला महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा त्यांचा पुतण्या गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याच अपघातात पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले नीलेश तावडे आणि सोनल जावरे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचे लग्न ठरले होते आणि ते भविष्यातील आयुष्याची स्वप्ने रंगवत दुचाकीवरून प्रवास करत होते. मात्र, समोरून आलेल्या कारच्या जोरदार धडकेमुळे त्यांची दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि दोघांनीही जागीच प्राण गमावले.
अवघ्या काही दिवसांवर आलेले लग्न, आनंदाचे वातावरण आणि नव्या आयुष्याची स्वप्ने एका क्षणात संपुष्टात आली. या भीषण दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांचे आनंदाचे क्षण कायमचे हिरावले गेले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


