पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. बारामती आणि आसपासच्या भागात आज ‘लॉकडाऊन’ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी गावे, बाजारपेठा, मार्केट यार्ड आणि दुकाने बंद पडली आहेत. अजितदादांच्या शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि संबंधित संस्था आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बारामतीमध्ये प्रचंड गर्दी
अपघाताची बातमी समजताच राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि सामान्य नागरिक बारामतीकडे धावले. विमान अपघातस्थळ, रुग्णालय आणि अजित पवार यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बारामती बंद आहे. दुकाने, बाजारपेठा, मार्केट यार्ड, वाहतूक आणि इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. पुढील दोन दिवस बारामतीत मोठी गर्दी अपेक्षित आहे. अंत्यसंस्कार बारामतीतच होणार असल्याने लाखो लोक येण्याची शक्यता आहे.
शिक्षण संस्था आणि शाळा-महाविद्यालये बंद
अजित पवार यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अनेक शिक्षण संस्था, शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान, सहकारी संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शोक व्यक्त करत बंद केले आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागातही शाळा-कॉलेजमध्ये अनौपचारिक बंद पाळले जात आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ आहे.


