Indapur: मागील दोन महिन्यांपासून वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे इंदापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलत कळस आणि चाकाटी या दोन गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. तर शेटफळ गढे, वकीलवस्ती आणि लुमेवाडी या तीन गावांसाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिली.
उजनीची घटती पातळी आणि विहिरींचे अधिग्रहण
यावर्षी उजनी धरणाची पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यातच खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात न आल्याने कालव्यालगत असलेल्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे ऐन एप्रिल-मे महिन्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. सध्या चाकाटी गावातील १३१६ आणि कळस परिसरातील (पिलेवाडी, गोसावीवाडी, भिरंगुडी वस्त्यांसह) ७२४० नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे. टँकर भरण्यासाठी प्रशासनाने टण्णू गावातील सत्यजित मोहिते यांची विहीर आणि बिल्ट ग्राफिक्स कंपनीची पाणी योजना अधिग्रहित केली आहे.
६४१ नवीन हातपंपांचा कृती आराखडा मंजूर
पाणीटंचाईच्या या गंभीर संकटावर मात करण्यासाठी इंदापूर पंचायत समितीने विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार तालुक्यात ६४१ नवीन हातपंप बसवण्याचा आणि २२ जुन्या हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तात्पुरता का होईना, पण मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
‘या’ गावांमध्ये बसवले जाणार नवीन हातपंप
प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार तालुक्यातील विविध गावांमधील वाड्या-वस्त्यांवर नवीन हातपंप बसविण्यात येणार आहेत, ती गावे पुढीलप्रमाणे:
- गलांडवाडी नंबर १: दिवसे डेअरी नरुटवाडी, काळखे वस्ती, चोपडे वस्ती, जाधव वस्ती, नरुटवाडी स्मशानभूमी, माने वस्ती आणि प्राथमिक शाळा परिसर.
- मदनवाडी व विरवाडी: बंडगर वस्ती, जालिंदर वस्ती, देवकाते वस्ती, विरवाडी नंबर १ व २, गावठाण आणि गणपती मंदिराजवळ.
- निरगुडे: सोनावणे वस्ती (१ व २), लकडे वस्ती, गावठाण, केकाणवस्ती, पानसरे वस्ती, वाकडे वस्ती आणि पवार वस्ती.
प्रशासकीय भूमिका
तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता शासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध करून देण्यास प्रशासनाचे मुख्य प्राधान्य आहे, असं तहसीलदार जीवन बनसोडे आणि गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी म्हटलं आहे.


