Unseasonal rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी पावसाची शक्यता, तर कधी अचानक उकाडा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात पावसाची हजेरी होती, डिसेंबरमध्ये थंडी दाखल झाली, मात्र जानेवारी महिन्यात हवामान पूर्णपणे बदलताना दिसत आहे.
सुरुवातीला डिसेंबरप्रमाणेच जानेवारीतही थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र जानेवारी संपत आली असतानाच तापमानात सातत्याने बदल होत आहेत. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी असताना, राज्यात मात्र अपेक्षित थंडी जाणवत नाही. साधारणपणे उत्तर भारतात थंडी वाढली की राज्यातही थंडी वाढते, पण यंदा हे चित्र वेगळे दिसून येत आहे.
दरम्यान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या भागात तीव्र थंडीही जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
आज राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असून, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता असून तेथील हवामानस्थिती चिंताजनक बनली आहे.
राजस्थानातील अनेक भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, जयपूर हवामान विभागाने 31 जानेवारी रोजी पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. दुसरीकडे, राज्यातही काही भागांत आज पावसाची शक्यता कायम आहे.
दरम्यान, मुंबईतील वाढते वायू प्रदूषणही चिंतेचा विषय ठरत असून प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप प्रदूषणात फारशी घट होताना दिसत नाही.


