Vidhan Parishad Election : नागपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी रणनीती आखली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाची मते फुटू नयेत आणि नगरसेवक एकसंघ राहावेत यासाठी भाजपकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेतील सर्व भाजप नगरसेवकांना प्रथम तीन दिवस गोव्यात नेण्यात येणार आहे. त्यानंतर ते मुंबईत परत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे 17 जून रोजी सर्व नगरसेवक नागपूरला परततील आणि 18 जून रोजी मतदान होणार आहे.
या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जून रोजी नगरसेवकांना नागपूरहून मुंबईकडे रवाना केले जाणार आहे. 11 जूनला ते गोव्याकडे जातील आणि 14 जूनपर्यंत तेथे मुक्काम करतील. त्यानंतर मुंबईत परत येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा आणि प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील.
यानंतर नगरसेवकांना पुन्हा नागपूरला आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांना स्थानिक राजकीय हालचालींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधान परिषद निवडणुकीत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असले तरी क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यामागे पक्ष संघटन, प्रशासनिक समन्वय आणि आगामी स्थानिक निवडणुकांसाठी मार्गदर्शन हा उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनामुळे राजकीय चर्चांना चांगलाच वेग आला आहे.


