अमरावती : अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गळचेपी वाढत असताना, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय? शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत,” असा धमकीचा इशारा देत कडू यांनी फडणवीसांच्या ‘ओला दुष्काळ’ नाकारण्यावरून टीका केली. कडू यांच्या या सडकून भाष्याने राजकीय वातावरण तापले आहे.
ओला दुष्काळ’वरून फडणवीसांवर ‘लबाडपणा’चा आरोप
बच्चू कडू म्हणाले, एनडीआरएफच्या निकषांशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनीच ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ असे पत्र पाठवले होते. आता ते म्हणतात, ‘ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दात येत नाही.’ हा मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, हेच समजत नाही.
कडू यांनी पुढे म्हटले की, सातबारा कोरा करतो म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर ‘देऊ’ असं म्हणतो. कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दुष्काळाची वाट पाहतो, हा किती करंटेपणा आहे? म्हणजे माणूस मेल्यावर तुमचं कर्ज माफ होईल. हे प्रभू रामाचे भक्त आहेत. ‘मुँह में राम, बगल में छुरी’, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.
शक्तीपीठ प्रकल्पासाठी पैसे नाहीत मग हे कुठून आले?
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी निधी अभाव सांगितला जात असताना, शक्तीपीठ विकास प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याचा मुद्दा कडू यांनी उपस्थित केला. “पैसे नाही असं म्हणतात, मग शक्तीपीठ आलं कुठून? मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना हरवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी पैसे दिले. लग्न करायचं पण हुंड्यासाठी बायको कामाची नाही, अशी ही भाजपची अवलाद आहे,” असा टोला कडू यांनी लगावला. अतिवृष्टीग्रस्त भागांत शेतकऱ्यांना तात्काळ मदत न देता इतर खर्चांना प्राधान्य देण्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
महाराष्ट्रात किती सोंगे केली? अजित पवारांवरही टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कडू यांनी सोडले नाही. शेतकरी मरत आहे आणि अजित दादा म्हणतायत, ‘पैशाचं सोंग करता येत नाही.’ अजित दादा, तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केले? सोंग जमत नाही तर पदावर कशाला राहता? असा प्रत्यय कडू यांनी दिला.
फडणवीसांची ‘चतुराई’ आणि पंजाबच्या तुलनेत ‘चौथीचा मुलगा’
शेतकऱ्यांसाठी आलो, एवढा आधार शेतकऱ्याला मिळेल, माझ्या शेतकऱ्यांच्या दोन-तीन आत्महत्या थांबतील. सध्या मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री कशात हुशार आहे हे मला कळलं. पंजाबने शेतकऱ्यांना ५०,००० दिले, तुमच्या सरकार किती देणार? असा प्रश्न. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, ‘आमच्या आठ कलेक्टरांचे मीटिंग झाली.’ एखाद्या चौथीच्या मुलगा तरी उत्तर बरोबर देतो. प्रश्न काय विचारता आणि तुम्ही सांगता काय? तुम्ही ही चतुराई शेतकऱ्यांसाठी वापरली तर शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
कापूस आयात आणि ‘स्वदेशी’चा नारा, मोदींवरही टीका
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही कडू यांनी कडक टीका केली. “मोदीजींनी आपला कापूस विदेशात पाठवला नाही, पण इतर देशांचा कापूस आपल्या छाताडावर आणला. कापूस आयात करतात आणि स्वदेशीचा नारा देतात, किती भुरळ पाडतात! मी मोदीजींना पत्र पाठवलं. तुम्ही चहा विकत होते त्या चहामध्ये किती नफा घेत होता? एवढ्याशा चहामध्ये अर्ध दूध, अर्ध पाणी टाकत होता!” असा सडकून प्रत्यय दिला.
लाडकी बहीण योजनेला ‘मतासाठी’चा टोला
लाडकी बहीण योजनेवर कडू म्हणाले, लाडक्या बहिणींना परिस्थिती पाहून नाही, तर मत पाहिजे होते म्हणून पैसे दिले. गुलाबराव पाटलांच्या विधानावरून ते म्हणाले, “गुलाबराव म्हणतात, गावात येऊन दाखवा. मी गावात गेलो, वेशीवरून परत आलो. त्यांनी माझा पाहुणचार करून ठेवला होता. मी त्यांना सांगितलं, विदर्भाचा ठेचा भाकर घेऊन येतो, कर्जमाफी झाल्यानंतर. कापसाच्या ऐवजी गुलाब लावा, कमळवाल्यांबरोबर गुलाब चांगला दिसेल, असं कडू म्हणाले.


