जळगाव : शिवसेना शिंदे गटाच्या पाचोरा येथील निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी महायुतीतील भाजपवर सडकून टीका करताना सरकारला जाहीर सभेत घरचा आहेर दिला. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा थेट टोला लगावत त्यांनी अतिवृष्टीग्रस्त मतदारसंघातील विकासकामांना मिळालेल्या निधीची कमतरता अधोरेखित केली.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्वीच्या मुख्यमंत्रीपद काळातील कामगिरीचे कौतुक करत त्यांना ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देताना पाटील यांनी भाजपच्या बंडखोरांना पक्षात घेण्यावरही कडाक्याची टीका केली.
मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले, “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवले तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात, पण कधी पलटी खाणार हे सांगता येत नाही.” आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देत महायुतीतील मतभेद उघड केले. “दोन टर्मपासून विरोधक गुपचूप किंवा थेट उमेदवार देऊन मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंचे जोरदार कौतुक
पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपद काळाचे कौतुक करत म्हटले, “शिंदे हे इतिहासातील पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी प्रत्येक भगिणीला लाडके भाऊ म्हणून ओळखले. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचे मानधन त्यांनी सुरू केले, ज्याची किंमत ग्रामीण भागातील बहिणींना चांगली माहिती आहे. शिंदे म्हणाले होते की पुन्हा मुख्यमंत्री झालो तर हे २,१०० रुपयांपर्यंत वाढवीन, पण ते पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत हे दुर्दैव आहे.” मात्र, गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात असल्याने या विषयावर जास्त बोलता येत नाही, असे ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात मोठे नुकसान झाल्याचे सांगत पाटील यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. “शिंदे सरकारच्या काळात ‘एक रुपयाचा पिक विमा’ योजना सुरू होती, जी शेतकऱ्यांना मोठी मदत करत असे. ही बंद केल्याने आज शेतकरी हवालदिल झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना राबवली तर शासनाकडे हात पसरावे लागले नसते,” असा आरोप करत त्यांनी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
‘फोन उचलत नव्हते, आता पद देता का?’
भाजपवर बंडखोरीच्या मुद्द्यावर पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. “भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष हकालपट्टी, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर सभेत म्हटलं. पण विधानसभा निवडणुकीवेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरी झाली तेव्हा मी त्यांना फोन केला, पण ते उचलत नव्हते. आता ज्यांनी बंड केले त्यांना कारवाईऐवजी पदे देऊन शाबासकी देता का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या विरोधकांना पक्षात घेण्यावरून सडकून टीका केली.
शिक्षण संस्था चालकांना भाजपमध्ये घेतल्याबद्दलही त्यांनी खरपूस फैलावले. “पाचोरा-भडगाव मतदारसंघात विरोधकांना भाजपने पक्षात घेतले, पण हे सर्व संस्थाचालक आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एसआयटी लावली म्हणून भीतीने ते भाजपकडे गेले. मुख्यमंत्री भाजपचे असले तरी शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत हे विसरू नका. गोरगरीब आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली तर सावध व्हा,” असा इशाराही त्यांनी दिला.


