वर्धा : वर्धा जिल्ह्यातील खडकी येथे तुळजापूर-नागपूर मार्गावर सामाजिक वनिकरण नर्सरीजवळ झालेल्या भीषण कार अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या दुभाजकावर धडक दिली आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकखाली चिरडली गेल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन महिला आणि एक 25 वर्षीय तरुण अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनघरे कुटुंबातील पाच सदस्य कारने नागपूरकडे जात होते. खडकीजवळ कारचा वेग जास्त असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. यानंतर कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले, मात्र तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
स्थानिकांचा संताप
तुळजापूर-नागपूर मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, स्थानिकांनी रस्त्याच्या दुभाजकाची सदोष रचना आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.


