RBI Restrictions: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने साताऱ्यातील सहकारी बँक द यशवंत सहकारी बँक लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने या बँकेवर लागू असलेले निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवले आहेत. 28 मे 2025 रोजी लादण्यात आलेल्या सहा महिन्यांच्या मर्यादेनंतर आता हा कालावधी 29 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 असा करण्यात आला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, सार्वजनिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
कायदेशीर अधिकारांतर्गत निर्बंध वाढवले
बँकिंग नियमन कायद्यातील कलम 35अ(1) आणि सेक्शन 56 च्या अधिकारांचा वापर करून आरबीआयने हे निर्बंध आधी लागू केले होते. मे अखेरीपासून लागू असलेल्या या मर्यादांमध्ये आता वाढ करून बँकेवर अधिक काळ निगराणी ठेवली जाणार आहे.
बँकेवर लागू असलेले प्रमुख निर्बंध
28 मेपासून सुरू झालेल्या निर्बंधांनुसार बँकेला नवे कर्ज मंजूर करणे किंवा जुन्या कर्जांचे नूतनीकरण करण्यास, नव्या ठेवी स्वीकारण्यास, गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेण्यास, देणी परतफेड करण्यास तसेच मालमत्ता विक्री करण्यास मनाई केली आहे. बँकेची आर्थिक घसरण आणि कमकुवत होत चाललेली स्थिती पाहता हा निर्णय आवश्यक ठरल्याचे आरबीआयने सांगितले आहे.
हेही वाचा – RBI: सोलापुरातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत
मेधा कुलकर्णींचा आक्रमक पवित्रा
यशवंत बँकेत उघड झालेल्या आर्थिक गोंधळानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणावर जोरदार भूमिका घेतली होती. त्यांनी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची मालमत्ता तातडीने जप्त करण्याची मागणी केली होती. बँकेच्या ठेवीदारांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्या स्वतः कराडमध्ये गेल्या होत्या. त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय स्तरावर मोठी चर्चा रंगली होती.
112 कोटींच्या गैरव्यवहारामुळे गुन्हा दाखल
दरम्यान, यशवंत बँकेत तब्बल 112.10 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकरांसह 50 जणांविरुद्ध कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


