Bhaskar Jadhav: एकीकडे देशात आता कोरोनासारखी स्थिती पुन्ही उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात कशाचाही तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. मात्र अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत, एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारने आता केरोसिन देण्याचंही जाहीर केलं आहे. अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही अशी टीका ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. नेहरुंमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, असं सांगितलं नाही म्हणून मी भाजपला धन्यवाद देतो असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यासंबंधी बोलताना भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जहरी टीका केली. काँग्रेसच्या काळातील साडे तीनशे रुपयांना मिळणारा गॅस आता हजार-बाराशेला मिळतोय, असं असलं तरी भाजपवाले काँग्रेसवर टीका करतात असं जाधव म्हणाले.
केरोसिन का देता?
पंतप्रधान स्वत: सांगतात कोविड सारखी स्थिती आहे आणि आपले पुढारी काहीच झालं नाही अशा बढाया मारतात, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुमच्याकडे सगळं भरपूर आहे असं सांगता, मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर द्यायचा निर्णय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीही हात धरू शकत नाही. फक्त आजच्या परिस्थितीला नेहरू आणि उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत असा आरोप भाजपने केला नाही, याबद्दल आपण भाजपला धन्यवाद देतो असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
भोंदूगिरीला भाजप जबाबदार
देशातील वाढत्या भोंदूगिरीसाठी भाजप जबाबदार असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले की, “2014 पासून देशात अंधश्रद्धेवर लोकांचा खूप विश्वास बसायला लागलाय. भोदूंगिरी, भगतगिरी बाबा आणि साधू सगळे चमत्कार घडवतात असा लोकांचा समज झाला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार देखील सुरू झाला. राजकारणी लोक सुद्धा बाबा-बुवांच्या च्या मागे लागले. भगतगिरी किंवा बाबा बुवा यांच्या माध्यमातूनच सत्तेचा मुकुट घालता येईल असा अनेकांचा समज झाल्याचं दिसतंय. भोंदूबुवांचे पाय धरल्यामुळे राजकारणी लोकांची प्रगती झाली, मग तशी प्रगती होण्यासाठी आम्हाला देखील भोंदूबाबांकडे जायला हवं असा समज काही राजकीय लोकांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पसरला आहे. अशोक खरात प्रकरण हा त्यातीलच एक प्रकार आहे.”
राजसत्ता आणि धर्मसत्ता हे वेगवेगळी असायला हवं. धर्माचं अवडंबर माजवून ज्या वेळेला राजकारणी राजसत्ता राबवयाला बघतात, त्यावेळी आपला राजधर्म विसरून विवेक नष्ट होतो आणि अघोरी विद्या किंवा बंगाली बाबासारखे प्रकार घडतात, असं भास्कर जाधव म्हणाले.


