BJP vs Shinde Sena: पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील युतीमधील तणावाचा परीणाम आता थेट मुंबईत पोहोचला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील ‘मैत्रीपूर्ण’ लढतीने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच, दोन्ही मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमकी ठिणगी कुठे पडली?
वॉर्ड १७३ मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात सामना रंगला आहे. शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या एकाच परिसरात समोरासमोर आल्या. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चक्क ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा स्वतःच्याच मित्रपक्षाने (भाजप) वापरल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार राडा झाला.
‘दोस्तीत कुस्ती’ की राजकीय दगाफटका?
या वादाची पार्श्वभूमी जागावाटपातील गोंधळामुळे उद्भवली आहे. अधिकृतपणे ही जागा शिंदे सेनेला सुटलेली होती. जागा शिंदे सेनेची असूनही भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी पक्षाचा ‘एबी फॉर्म’ जोडून अर्ज भरला आणि तो वैध ठरला. नाईलाजाने या ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ जाहीर झाली, जी आता थेट वादात रूपांतरित झाली आहे.
हेही वाचा – Sanjay Raut Meet Eknath Shinde: संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची खास भेट; एकमेकांच्या तब्येतीची केली विचारपूस
संजय शिरसाट आक्रमक
या घटनेनंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजपमधील हे ‘महारथी’ कोण आहेत, याचा तपास झाला पाहिजे. अशा घोषणा देण्यापूर्वी आपल्या नेत्यांना विचारायला हवे होते. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत बसला आहात, हे विसरू नका. शिरसाट यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
भाजपची सावध प्रतिक्रिया
दुसरीकडे, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असले, तरी मतदानापूर्वी झालेल्या या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.


