Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, विधान परिषदेच्या 9 रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकीचे निकालही स्पष्ट होणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मतदानाची वेळ सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
दिग्गजांची आमदारकी संपणार; कुणाची खुर्ची धोक्यात?
येत्या 13 मे रोजी 9 विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये राज्याच्या राजकारणातील अनेक मोठ्या नावांचा समावेश असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवृत्त होणाऱ्या प्रभावी चेहऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके, राजेश राठोड आणि रमेश कराड या दिग्गजांचा समावेश आहे. यातील किती नेत्यांना पुन्हा संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीचे पारडे जड
विधानसभेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता, ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांच्या कोट्याची गरज आहे. महायुतीची ताकद पाहता, भाजप (131), शिवसेना-शिंदे गट (57) आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट (40) यांच्या एकत्रित बळावर महायुतीचे 8 उमेदवार सहजपणे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे सध्या 46 आमदारांचे पाठबळ आहे, ज्या जोरावर त्यांचा एक उमेदवार सुरक्षित आहे; मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?
संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते शिल्लक आहेत. जर महायुतीने या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार मैदानात उतरवला, तर ही निवडणूक बिनविरोध न होता अत्यंत चुरशीची ठरू शकते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला आपली दुसरी जागा वाचवणे हे मोठे आव्हान ठरेल. आता सर्व पक्षांच्या रणनीतीवर ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदानाची वेळ येणार, हे अवलंबून आहे.


