सातारा: रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमांतून चुकीच्या माहितीच्या आधारावर आरोप केले जात आहेत. हे आरोप करणाऱ्यांचा दोष नाही. पण त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली गेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी माझ्यावरील आरोपांचा निषेध करावा, पण ते सभ्य पद्धतीने करावा. राष्ट्रवादीचे नेते मेहबुब शेख असोत किंवा अंधारे ताई असोत, त्यांच्या विरोधात एकेरी आणि खालच्या दर्जाची भाषा वापरणे चुकीचे आहे. निंबाळकरांनी पुढे सांगितले की, आपण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. म्हणूनच कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचा विचार न करता, बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करावे.
या व्हिडिओतून निंबाळकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय शिस्त आणि संस्कृती जपण्याचा सल्ला दिला. आपली परंपरा, आपली संस्कृती टिकवायची आहे. आपण जे कार्य मागील एक वर्षात केलं, त्याच्या आधारावरच आपली ओळख निर्माण करायची आहे. म्हणूनच सामाजिक माध्यमांवर किंवा सभांमध्ये कुणाचाही अपमान होणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं. त्यांच्या या विधानानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलं असून, काहींनी याला राजकीय परिपक्वतेचं उदाहरण म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत निंबाळकरांवर थेट टीका करत त्यांचा फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वकिल धीरज घाडगे यांनी सुषमा अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटिशीत 48 तासांच्या आत प्रसारमाध्यमांसमोर लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा 50 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला होता. अंधारे यांनी मात्र हे आव्हान स्वीकारत म्हटलं की, निंबाळकरांच्या वकिलांनी नीट अभ्यास करावा आणि त्यानंतरच कायदेशीर कारवाईबद्दल बोलावं. त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर प्रकरणाने नवा वळण घेतलं आहे.
साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा
विरोधकांकडून या घटनेवरून भाजपवर निशाणा साधला जात असला, तरी निंबाळकर समर्थकांच्या प्रतिक्रिया आता नियंत्रित करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्व करत आहे. फलटणसह साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. काहींच्या मते, मुख्यमंत्री फडणवीस यांनी निंबाळकरांना सार्वजनिकपणे दिलेली क्लीन चिट ही भाजपच्या आंतरिक दबावातून देण्यात आली असावी. तर, काहीजण हे विरोधकांचा केवळ राजकीय डाव, असल्याचं सांगत आहेत. विरोधक मात्र ठाम आहेत की, तपास प्रक्रियेत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सत्य बाहेर येईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
निंबाळकरांनी संयम आणि शिस्तीचा संदेश देऊन समर्थकांना शांत केले
फलटणच्या राजकीय वातावरण या प्रकरणामुळे तापले आहे. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर निंबाळकरांवरील आरोप अजूनही चर्चेचा विषय आहेत. निंबाळकरांनी संयम आणि शिस्तीचा संदेश देऊन समर्थकांना शांत केले असले, तरी राजकीय स्तरावर त्यांच्या विरोधातील टीकेची धार कायम आहे. सुषमा अंधारे आणि मेहबुब शेख यांच्या विधानांमुळे विरोधी आघाडीत उत्साह वाढला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण पुन्हा रंगणार अशी चिन्हे दिसत आहेत. राज्यात राजकीय तापमान वाढलेलं असतानाच, फलटण प्रकरणाने राजकीय समीकरणांमध्ये नवी हलचाल निर्माण केली आहे.


