Supriya Sule On Land Scam: पुण्यातील तब्बल १८०० कोटी रुपयांच्या जमिनीचा फक्त ३०० कोटी रुपयांत व्यवहार झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर झाला असून, या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पार्थ पवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळत मी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर अजित पवार यांनी यावर अद्याप मौनच पाळले आहे.
विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, ‘या प्रकरणात काहीतरी गोलमाल आहे. तहसीलदार आणि तलाठी यांना बिनबुडाचे निलंबन करण्यात आले. ते म्हणतात की आम्ही सहीच केली नाही, मग त्यांच्यावर कारवाई का झाली? तो गरीब अधिकारी आहे म्हणून त्याला कामावरून काढले, हा सरळ अन्याय आहे.’ त्यांनी सरकारकडे या दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.
पत्रकारांनी विचारले, ‘तहसीलदारांचे निलंबन पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी झाले का?’ यावर सुळे म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार पार्थ यांना काही प्रश्न विचारण्यात आले असून, त्यावर त्यांची कायदेशीर टीम उत्तर देईल. पण सरकार म्हणते व्यवहार होऊ शकत नाही, तर मग स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? तहसीलदार म्हणतोय मी सही केली नाही, मग त्याला नोकरीवरून का काढले? हे स्पष्ट दाखवते की काहीतरी काळंबेरं आहे.
हेही वाचा – जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर पार्थ पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…,
सुप्रिया सुळे यांनी आणखी माहिती देताना सांगितले, ‘मी सकाळीच पार्थशी बोलले. त्याने स्पष्ट सांगितले की यात माझी काही चूक नाही आणि माझे वकिल लवकरच सर्व कागदपत्रांसह आपल्यासमोर येतील.’ दरम्यान, अजित पवार यांच्या मौनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता या कथित जमीन व्यवहारावर सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


