Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत मोठा बदल म्हणजे रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवडीसंदर्भात अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची अहमदाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीत 2027 च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तरुण खेळाडूंना नेतृत्वाच्या भूमिकेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेदरम्यान गिलचे नाव पुढे आले आणि त्यावर BCCI चे सचिव देवजीत सैकिया तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली.
गिलकडे सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्वाचा अनुभव
शुभमन गिल सध्या भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार आहे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार म्हणूनही तो काम पाहतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली, तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पहिल्या कसोटीत भारताने डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला. गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना आपल्या रणनीतिक कौशल्याची झलकही दाखवली होती.
रोहितच्या यशस्वी नेतृत्वाचा वारसा
दुसरीकडे, रोहित शर्मा 2021 मध्ये भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार बनला होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 56 सामन्यांपैकी 42 सामने जिंकले, फक्त 12 गमावले आणि एक सामना अनिर्णीत राहिला. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने 2018 आणि 2023 चा आशिया कप जिंकला, तसेच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत अपराजित वाटचाल केली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
अनुभव आणि तरुणाईचा संगम
या मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू कायम ठेवण्यात आले असून, तरुण खेळाडूंना संधी देत पुढील पिढीकडे नेतृत्व सुपूर्द करण्याचा संकेत देण्यात आला आहे. क्रिकेट वर्तुळात गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसा प्रदर्शन करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


