अष्टपैलू: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सनसनाटी निकालाची नोंद झाली. क्रिकेटच्या पटलावरुन अस्ताला जात चाललेल्या झिम्बाब्वे संघाने पुन्हा एकदा आपली झलक दाखवली. झिम्बाब्वेने चारवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २३ धावांनी हरवले. नक्कीच, हा निकाल सनसनाटी आहे यात शंका नाही. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी दाखवलेली जिगर आणि संघटित वृत्ती अप्रतिम होती. त्याचे कौतुक करायलाच हवे. वाघ जखमी असला तरी त्यावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत होत नाही. कारण तो तशाही परिस्थितीत प्रतिहल्ला करण्याची ताकद राखून असतो. म्हणून कायम तोच जिंकेल असे नाही. कधी तरी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला जातो. तेच झिम्बाब्वेने दाखवून दिले.
विश्वचषक स्पर्धेसाठी आलेला ऑस्ट्रेलिया संघ मुळात जखमी खेळाडूंचा आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क या संघात नाहीत. मिशेल मार्शही संघाबाहेर गेला आहे. प्रत्येक खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त नाही. तरी ऑस्ट्रेलिया संघात पलटवार करण्याची क्षमता आहे. ती त्यांच्या रक्तात असलेल्या क्रिकेटमध्ये आहे. आज त्याच क्षमतेला झिम्बाब्वेने आव्हान दिले.
फलंदाजीमध्ये त्यांच्या डावाला वेग नव्हता. कूर्मगतीने त्यांचा डाव पुढे गेला. सलामीला येऊन अखेरपर्यंत बेनेट खेळपट्टीवर टिकून राहिला हे झिम्बाब्वेसाठी फायद्याचे ठरले. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. फटकेबाजीच्या मोहात न पडता धावा गोळा करता करता झिम्बाब्वेच्या फलंदाजानी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना निराश केले. ऑस्ट्रेलियाला पूर्ण वीस षटकांत त्यांचे केवळ दोनच गडी बाद करता आले. बेनेट टिकून असताना दुसऱ्या बाजूने आलेल्या फलंदाजांनी काहीशी आक्रमकता दाखवून डावाला वेग देत संघाचे आव्हान दीडशेच्या पलिकडे जाण्याची काळजी घेतली.
अर्थात, टी २० क्रिकेटमध्ये कोणतेही आव्हान भक्कम नसते आणि त्यात ऑस्ट्रेलियाकडे ट्रॅविस हेड, आयपीएलमध्ये सर्वाधिक भाव मिळालेला कॅमेरुन ग्रीन, मार्कस स्टोईनिस, मॅट रेनशॉ, अद्भुत खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल असा सगळा फलंदाजीतला दारुगोळा होता. पण, आज या दारुगोळ्याला काडी लागलीच नाही. ही सगळी स्फोटके पेटण्यापूर्वीच निकामी झाली. पॉवर प्लेच्या षटकात चार फलंदाज गमावले. निम्मी षटके झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६९ पर्यंत पोहचली होती. अशा वेळी ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ टिकले. त्यांची भागीदारी होऊ लागली.
ऑस्ट्रेलियाला आशेचा किरण दिसला. मात्र, रायन बर्ल याच्या लेगस्पिनचा वापर करण्याचा जुगार झिम्बाब्वेने खेळला. समोर मॅक्सवेल उभा होता. पहिला चेंडू गेला. दुसरा चेंडू टाकला. चेंडूचा टप्पा पडायच्या आत मॅक्सवेलने फटकाविण्याचा पवित्रा घेतला. मॅक्सवेली बॅट हवेतच फिरली. चेंडू टप्प्यावर पडून थेट यष्टिंवर आदळला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा पराभव लिहिला गेला. त्यानंतर स्टोईनिस होता. मात्र, आतापर्यंत देशासाठी खेळताना त्याला आपल्या गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही. स्पर्धेतील पहिला सामना त्याला अपवाद होता. त्यात गोलंदाजी करताना झेल घेताना हात दुखावला होता. त्यालाही जमले नाही. दडपणाखाली त्यांचे बाकी फलंदाज अगदी दुसऱ्या बाजूने टिकून राहिलेला रेनशॉ देखिल बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव लिहिला गेला.
झिम्बाब्वेच्या विजयात त्यांची जिद्द जेवढी महत्वाची ठरली. तेवढी आपणही जिंकू शकतो ही त्यांच्यात निर्माण झालेली मानसिकता देखिल महत्वाची होती. त्यांचे अप्रतिम क्षेत्ररक्षण ही त्याची पावती होती. सीमारेषेवर अडवलेले चौकार, षटकार जाणारे चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात विसावले. काही अफलातून झेल देखिल त्यांनी घेतले. अशा सर्वोत्तम सांघिक प्रयत्नांनी त्यांनी हा विजय मिळविला. क्रिकेट विश्वाला जेवलढा धक्का बसला, तेवढाच धक्का झिम्बाब्वेच्या खेळाडूंना देखिल बसला. त्यामुळेच त्यांची प्रतिक्रिया केवळ अद्भुत अशीच उमटली. टी २० विश्वचषक स्पर्धेत २००७ नंतर पुन्हा एकदा त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवले.
अन्य दोन सामन्यात अमेरिकेने आपले विजयाचे खाते उघडले. अमेरिकने नेदरलॅण्ड्स संघाला हरवले. संयुक्त अरब अमिरातीने ओमानला हरवले. या स्पर्धेत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे तीन संघ सर्वात तगडे ठरत आहेत. त्यांची आगेकूच देखिल सुरु आहे. भारत गटातून पुढे जाणार यात शंका नाही. त्यांच्याबरोबरीने पाकिस्तानला संधी आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एकाच गटात आहेत. त्यांच्याबरोबरीने अफगाणिस्तान संघाकडे बघितले जात होते. पण, ते दोन सामने हरले आहेत. ब गटातून ऑस्ट्रेलियाचे आव्हान खडतर झाले आहे. त्यांना आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील. या गटात प्रत्येकी दोन सामने झाल्यानंतर श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांनी दोन विजयासह आपली मोहिम धडाक्यात सुरु ठेवली आहे. क गटातून वेस्ट इंडिजने कमाल केली आहे. त्यांच्या गटातून दुसरा संघ कोणता हे अजून निश्चित नाही. इंग्लंडला अजून सूर गवसलेला नाही.


