ICC Ultimatum BCB: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट संघ या आगामी विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आयसीसी (ICC) बुधवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून, लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या संघाला विश्वचषक सामन्यांसाठी भारतात पाठवण्यास नकार दिल्याचे समजते. या मुद्द्यावर आयसीसीने बुधवारी दिवसभर बैठक घेतली. आयसीसीने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, जर बांगलादेश बोर्डाने आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला, तर त्यांना स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
या बैठकीत टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या जवळपास सर्वच देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या प्रकरणावर मतदान (Voting) घेण्यात आले, ज्यामध्ये १६ पैकी १४ देशांनी आयसीसीच्या बाजूने कौल दिला. केवळ २ देशांनी या निर्णयाला विरोध केला, ज्यात एक बांगलादेश स्वतः आणि दुसरा देश पाकिस्तान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पराभवानंतर आयसीसीने बीसीबीला अंतिम इशारा दिला असून त्यांच्याकडे आता निर्णयासाठी केवळ एकच दिवसाचा वेळ उरला आहे.
स्कॉटलंडसाठी संधीची कवाडे उघडली –
बांगलादेश जर या स्पर्धेतून बाहेर झाला, तर त्यांच्या जागी कोणत्या संघाला संधी द्यावी, यावरही बैठकीत चर्चा झाली. रँकिंगनुसार आता स्कॉटलंड संघाचा दावा प्रबळ मानला जात आहे. स्कॉटलंड संघ युरोपियन क्वालिफायरमध्ये नेदरलँड्स, इटली आणि जर्सीकडून पराभूत झाल्यामुळे बाहेर पडला होता, मात्र बांगलादेशच्या संभाव्य हकालपट्टीमुळे त्यांना ‘लकी एन्ट्री’ मिळू शकते.
आता चेंडू बांगलादेशच्या कोर्टात –
आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पष्ट सांगितले आहे की, त्यांनी आपल्या सरकारशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवावा. जर त्यांनी संघ भारतात पाठवण्यास संमती दिली तरच ते विश्वचषक खेळू शकतील, अन्यथा स्कॉटलंडचा समावेश निश्चित मानला जात आहे.


