नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईल कंपन्यांकडूही अनेक फोन्स आणले जात आहेत. त्यातच, एकेकाळी भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर राज्य करणारी शाओमी आजकाल अडचणींनी घेरली आहे. भारतात शाओमीची चमक झपाट्याने कमी होताना दिसत आहे.
कंपनी सध्या घटत्या शिपमेंट, गोठलेले निधी आणि वाढत्या नियामक दबावांशी सामना करत आहे. या सर्वांमुळे, भारतीय बाजारपेठेवरील कंपनीची पकड कमकुवत होत आहे. भारत या चिनी कंपनीसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ होती. परंतु गेल्या काही वर्षांत, भारतीय बाजारपेठेत कंपनीची स्थिती खराब होत चालली आहे. आयडीसीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतात शाओमीची शिपमेंट २३.५% ने घसरली आहे.
यामुळे, कंपनी टॉप ५ ब्रँडच्या यादीतून बाहेर पडली आहे. विवो आणि ओप्पो सारख्या ब्रँडना याचा खूप फायदा होत आहे. विशेषतः मध्यम ते प्रीमियम श्रेणीच्या बाजारात, शाओमीची विक्री कमी झाली आहे. कंपनीची समस्या केवळ कमी विक्रीची नाही तर तिला इतर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
एकेकाळी हिस्सा होता ४५ टक्के
२०१८ मध्ये, शाओमीच्या जागतिक महसुलापैकी ४५ टक्के भारतातून येत होता. आज हा आकडा एक अंकी झाला आहे. कंपनीने भारतावर लक्ष केंद्रित करून उत्पादनांचे लाँचिंग देखील कमी केले आहे. इतर ब्रँड नवीन मॉडेल्स लाँच करत असताना, शाओमी फक्त काही फोन लाँच करत आहे.


