आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, अनेक प्रयत्नही केले जातात. पण, काही समस्या या उद्भवत असतातच. त्यात मधुमेह हा आज सर्वात वेगाने वाढणारा आजार मानला जातो. केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ‘साइलेंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराने लाखो लोक त्रस्त आहेत.
मधुमेह होण्याची अनेक कारण असू शकतात. त्यात चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित जीवनशैलीसोबतच मानसिक ताणतणाव हाही एक गंभीर घटक आहे. मानसिक तणाव हा आजच्या वेगवान जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. कौटुंबिक अडचणी, नोकरीतील दबाव, आर्थिक ताण किंवा वैयक्तिक समस्या, या सर्व गोष्टींमुळे मनावर ताण येतो. तणावाच्या काळात शरीरात कोर्टिसोल नावाचे संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्त्रवते. हे संप्रेरक इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत अडथळा आणते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. फायबरयुक्त अन्न, भाज्या, फळे, डाळी, संपूर्ण धान्य यांचा समावेश करावा. गोड, तळलेले आणि फॅटयुक्त पदार्थ शक्यतो टाळावेत. याने तुम्हाला चांगला फरक दिसून येऊ शकतो.
तणावामुळे धोका वाढू शकतो. अनेक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की, मानसिक ताण हा केवळ मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम करतो. ताणतणाव दीर्घकाळ टिकला तर तो मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा गंभीर आजारांना आमंत्रण देतो. विशेषतः ज्या लोकांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, त्यांना तणावामुळे हा आजार लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा.


