नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सिन्नर तालुक्यातील प्रभावशाली नेते उदय सांगळे यांनी पक्षाची साथ सोडली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत लाखभर मते मिळवलेल्या सांगळेंचा हा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धोका ठरत आहे.
दुसरीकडे, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रामदास चारोस्कर आणि त्यांची पत्नी सुनीता चारोस्कर हेही ३ नोव्हेंबरला भाजपमध्ये सामील होणार आहेत. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला अपेक्षित यश मिळाल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मविआला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सिन्नरमध्ये उदय सांगळेंचा भाजप प्रवेश निश्चित
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. सिन्नर तालुक्यातील पक्षाचे प्रमुख नेते उदय सांगळे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून, ते भाजपमध्ये जाणार आहेत. सांगळेंचा हा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसांत अंतिम होईल, अशी माहिती मिळत आहे. शरद पवारांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगळेंना सिन्नरमधून उमेदवारी दिली होती.
त्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात १ लाखांहून अधिक मते मिळवली होती, तरीही पराभवाचा सामना करावा लागला. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगळेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने तालुक्यातील राजकारणात बदल घडणार आहे. सांगळेंच्या सोबत अनेक स्थानिक कार्यकर्तेही भाजपकडे वळणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप स्वबळावर तालुका जिंकण्याच्या तयारीत आहे.
दिंडोरीत चारोस्कर दांपत्याचा भाजप प्रवेश
दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातही भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर हे दांपत्य ३ नोव्हेंबरला भाजपमध्ये सामील होणार आहे. रामदास चारोस्कर हे दिंडोरीमधील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात, तर सुनीता चारोस्कर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतली होती.
त्या निवडणुकीत त्यांना ९४,२१९ मते मिळाली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १ लाख ३८ हजार ६२२ मते मिळवून ४४,४०३ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. चारोस्कर दांपत्याच्या भाजप प्रवेशाने मविआला दिंडोरीत मोठा झटका बसला असून, हे ‘ऑपरेशन लोटस’चे यश मानले जात आहे.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी
नाशिक जिल्ह्यातील या राजकीय घडामोडी महाविकास आघाडीला (मविआ) कमकुवत करणाऱ्या ठरल्या आहेत. शरद पवार गटातील नेत्यांच्या सलग बंडखोरीमुळे पक्षाची अंतर्गत कलह वाढली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मविआचा पराभव होण्याची शक्यता आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत हे नेते मिळवले असून, नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. महायुती सरकारकडून स्थानिक पातळीवर मजबुतीकरण करत असल्याचे दिसत आहे.


