मुंबई: राज्याच्या राजधानीत गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. सुमारे 30 वर्षांचा वकिलीचा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिला वकिल मालती पवार (वय 59) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कोर्टाच्या बाररूममध्येच निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसराला शोककळा पसरली असून, वकिलांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मालती पवार या ठाण्यातील माजिवडा परिसरात राहत होत्या आणि मुंबईतील विविध न्यायालयांमध्ये, तसेच फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टात वकिली करत होत्या. गुरुवारी त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील कोर्टात एका प्रकरणाची प्रमाणित प्रत घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी आपल्या पती रमेश पवार यांना फोन करून सांगितले, माझी तब्येत ठीक नाही, मी थोडा वेळ बसते. काही मिनिटांतच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बाररूममध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेवर योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
मदतीचा हात वेळेत पुढे आला नाही; पतींचा आरोप
रमेश पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “कोर्टात माझ्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा कोणीही तात्काळ सीपीआर दिला नाही. काही लोक व्हिडिओ काढत होते, तर काहींनी फक्त पाणी देण्याचा प्रयत्न केला. जीटी हॉस्पिटल अगदी जवळ असतानाही तिला लगेच तिकडे नेलं गेलं नाही. नंतर आझाद मैदान पोलिसांनी मालती पवार यांना कामा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचं घोषित केलं. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा ती स्ट्रेचरवर पडलेली होती आणि तिच्याजवळ एकही सहकारी नव्हता, अशी वेदनादायी प्रतिक्रिया रमेश पवार यांनी दिली.
न्यायालयातील सुविधांचा गंभीर प्रश्न
या घटनेनंतर वकिल संघटनांकडून कोर्टातील आरोग्यविषयक सुविधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कोर्टात प्राथमिक उपचार सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे. मालती पवार यांचा मृत्यू ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून, न्यायालयातील मूलभूत सुविधांबाबतचा इशारा असल्याचं वरिष्ठ वकिलांनी म्हटलं आहे. तातडीने उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. आता तरी कोर्टात फर्स्ट एड आणि डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणी वकिलांमधून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, अनुभवी, संयमी आणि शांत स्वभावाच्या मालती पवार यांचा अकस्मात मृत्यू वकिली समाजासाठी मोठी पोकळी निर्माण करून गेला आहे.


