Mehboob Shaikh On Phaltan Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र निशाणा साधत विचारलं आहे की, बीड प्रकरणात विरोधी पक्षनेत्यावर खोट्या विनयभंगाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली, मग फलटणसारख्या गंभीर प्रकरणात मात्र एसआयटी का नेमली जात नाही?
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेहबूब शेख यांनी फलटण प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली. त्यांनी सांगितले की, मृत महिला डॉक्टरविरुद्ध एका महिन्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या. यामागे कोणाचा दबाव होता, हे शोधणं आवश्यक आहे. मेहबूब शेख म्हणाले, डॉक्टरने 19 जून रोजी डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे दबावाविषयी तक्रार केली होती. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात तिच्याविरुद्ध तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. आधी ती उत्कृष्ट अधिकारी होती, अचानक ती वाईट कशी झाली? या तिघांची नार्को टेस्ट घ्या आणि सत्य बाहेर आणा, अशी मागणीही मेहबूब शेख यांनी केली आहे.
हेही वाचा –सुषमा अंधारे फलटणमध्ये; जयकुमार गोरेंसह अनेकांची नावं घेत केले गंभीर आरोप
मेहबूब शेख यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची डॉक्टरच्या कुटुंबीयांची मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. शेख यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील निष्पक्ष तपास करण्यासाठी आयपीएस अंजना कृष्णा यांच्याकडे तपास सोपवावा. अजित पवारांनी त्यांना धमकावलं तरी त्या मागे हटल्या नाहीत. अशा धाडसी अधिकाऱ्यांच्या हाती हा तपास दिला, तर सत्य नक्कीच समोर येईल, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.


