K Annamalai Resigns: अण्णामलाई यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षातील प्रभावशाली चेहरा म्हणून ओळख असलेल्या के. अण्णामलाई यांनी मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही काळापासून अण्णामलाई आणि भाजप नेतृत्व यांच्यातील मतभेद वाढत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरात त्यांच्या समर्थनार्थ झळकलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्समुळेही या शक्यतेला बळ मिळत आहे.
भाजप नेतृत्वाशी वाढलेले मतभेद; नव्या राजकीय पर्यायाची चर्चा
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अण्णामलाई यांनी आगामी काही दिवसांत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले होते. भारतीय पोलीस सेवेतून राजकारणात आलेल्या अण्णामलाई यांनी अलीकडच्या काळात केंद्र सरकारच्या काही धोरणांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः CBSE च्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता 9 वीपासून लागू करण्यात आलेल्या त्रिभाषा सूत्राला त्यांनी विरोध दर्शवला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी त्यांचे मतभेद अधोरेखित झाले होते. त्यामुळे भाजपच्या चौकटीबाहेर जाऊन स्वतंत्र राजकीय मंच उभारण्याचा त्यांचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती.
AIADMK युतीनंतर दुरावा वाढला; 2026 च्या निवडणुकांपूर्वी मोठी घडामोड
2021 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान टी.टी.व्ही. दिनकरन आणि ओ. पन्नीरसेल्वम यांना भाजपसोबत आणण्यासाठी अण्णामलाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नैनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत समीकरणे बदलू लागली. आगामी 2026 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने AIADMK सोबत युती केल्यानंतर अण्णामलाई पक्षाच्या अनेक कार्यक्रमांपासून दूर राहिल्याचे दिसून आले. जागावाटप, उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे मतभेद वाढल्याची चर्चा होती. अखेर या मतभेदांचा कळस गाठत अण्णामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता तामिळनाडूसह देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


