मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्योगपती मित्रांचं कर्ज माफ केलं जातं, ते आरामात परदेशात असतात. पण शेतकरी आपली शेती, आपला जीव गमावतो तरी देश सोडत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.
खेकड्यांनी पॅकेजलाही भोकं पाडली का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजवर उद्धव ठाकरेंनी उपरोधिक टीका केली. मुख्यमंत्र्यांनी ज्या पॅकेजची घोषणा केली, त्या पॅकेजला खेकड्यांनी भोकं पाडली का? जशी धरणांना भोकं पाडली होती, असे म्हणत ठाकरेंनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता टोलाही लगावला.
हेही वाचा –“आम्हाला निवडून यायचे होते म्हणून…”, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत
तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात आयोजित सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या काळात चुकून काही जणांना मंत्री केलं होतं, पण पिक विमा वेळेत मिळाला नाही, तर शेतकरी तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवरही ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी पंचांग पाहून शुभ मुहूर्त ठरवला आहे का? जूनच्या शेवटी म्हणतात कर्जमाफी होईल, पण तोपर्यंत शेतकरी चालेल कसा? दोन हंगामांचं नुकसान झालं, तरी मदत कुठं आहे? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
मत चोरी नाही, मत दरोडा आहे
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, हे मत चोरी नाही, मतांवर दरोडा आहे. राहुल गांधींनी दाखवलेलं उदाहरण बघा एका महिलेचं नाव २२ ठिकाणी आहे, ती ब्राझीलमधली आहे. मग भारतीय जनता पार्टीची दुबार नोंदणी झाली का? एक ‘इंडियन जनता पार्टी’ आणि एक ‘ब्राझिलियन जनता पार्टी’? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांच्या मदतीचं पॅकेज कागदावरच
राज्यातील अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजवरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरले. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले, पण हजारो शेतकऱ्यांना अजून मदतीची प्रतीक्षा आहे. सरकार सत्तेच्या मस्तीत फिरतंय, पण शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या गेल्या आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.


