मुंबई: महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे बदल होणार आहेत. 30 नोव्हेंबर 2025 पासून सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena) निवृत्त होत असल्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा भार राजेश अगरवाल IAS यांच्या खांद्यावर येणार आहे. 1 डिसेंबरपासून ते महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) म्हणून पदभार स्वीकारतील.
राजेश अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी असून, सध्या ते केंद्र सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे (DEPwD) सचिव म्हणून कार्यरत आहेत. राजेश अगरवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून बी.टेक (Computer Science) पदवी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत येताच त्यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रशासनात कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्राचे वित्त विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
हेही वाचा –राज्यातील शाळा ५ डिसेंबरला राहणार बंद? काय आहे कारण? जाणून घ्या
राज्य आणि केंद्रातील महत्त्वपूर्ण भूमिका
अकोला आणि जळगाव जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली, तर केंद्रात कार्यरत असताना आधार, जनधन आणि डिजिलॉकर यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण हातभार लावला. सामाजिक न्याय, दिव्यांगजन सुविधा आणि डिजिटल इंडिया मोहिमेला त्यांनी चालना दिली. राजेश अगरवाल यांचा अनुभव, कार्यशैली आणि पारदर्शक प्रशासनाबाबतचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा प्रशासनिक आणि राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.


