पुणे: “माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्या
राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना “तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे.” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही “अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास निधी मिळेल,” असे म्हटले होते. यावरून भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
भोर नगरपालिका निवडणूक प्रचारानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच जाहीर सभा पडली. या सभेत बोलताना त्यांनी तिजोरीच्या चाव्यावरील विधानावर स्पष्टीकरण दिले. “मी परवा बोलताना म्हणालो होतो की चाव्या माझ्याकडे आहेत, पण तो केवळ बोलण्याचा एक भाग होता. लगेच काहींनी आठवण करून दिली की चावी तुमच्याकडे असली तरी तिजोरी आमच्या खोलीत आहे. अरे, पण कोणाच्याही खोलीत तिजोरी असू द्या, तिजोरी ही जनतेची आहे. ती माझ्या किंवा इतर कुणाच्या बापाची नाही, हे सत्य आहे,” असे अजित पवार म्हणाले.
माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे
महायुतीमध्ये तिजोरीच्या अधिकारांवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना अजित पवार म्हणाले, “माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून अधिकार आहेतच, त्याआधारे विकासाला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. पण, माझ्यापेक्षा जास्त अधिकार नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे आहेत, हे मी मान्य करतो.”
गुंडांना किंवा दोन नंबरवाल्यांना तिकीट दिले नाही
यावेळी अजित पवारांनी आपल्या उमेदवारांच्या चारित्र्यावर भर देत विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि स्थानिक विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “माझ्या पक्षाच्या उमेदवारांवर नजर टाका. रामचंद्र आवारे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मी ‘दोन नंबर’चे धंदे करणाऱ्यांना उमेदवार केलेले नाही. इतर पक्षांनी कुणाला उमेदवारी दिली आहे, ते तुम्हीच तपासा,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
संग्राम थोपटेंवर टीका
पुणे जिल्हा बँकेच्या कारभारावरून त्यांनी संग्राम थोपटे यांना लक्ष्य केले. “मी बेरजेचे राजकारण करतो, कामात मोकळीक देतो. पण तुम्ही ज्यांना जिल्हा बँकेवर निवडून दिले, ते संचालक मंडळाच्या मिटिंगला किती वेळा हजर असतात?” अशी विचारणा अजित पवारांनी उपस्थितांना केली.


