Manikrao Kokate: महाराष्ट्राचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. 16 नोव्हेंबर रोजी या संदर्भातील निकाल देण्यात आला असून, त्यानंतर लगेचच पोलिस यंत्रणांच्या हालचालीला वेग आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात कोणत्याही क्षणी अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अटक वॉरंट काढण्यात यावे, यासाठी न्यायालयात अधिकृत अर्ज सादर करण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयात अंजली दिघोळे यांनी हा अर्ज दाखल केला असून, न्यायालय आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटक वॉरंट निघाल्यास सत्ताधारी पक्षासमोर मोठी अडचण उभी राहू शकते.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील निर्णय काय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात; अजित पवारांच्या भेटीत मोठा निर्णय होणार?
फडणवीस-पवार भेटीत नेमकी काय चर्चा?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या न्यायालयीन प्रकरणाची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावर फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोकाटे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनीच घ्यावा. तसेच, जर न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, तर क्रीडामंत्र्यांचे खाते कोणाकडे द्यायचे, याबाबतही त्यांनी थेट प्रश्न विचारल्याचे सांगितले जात आहे. हायकोर्टाकडून जर शिक्षेला अंतरिम दिलासा मिळाला, तरच माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर राहू शकतील. अन्यथा मंत्रिमंडळातील बदल अटळ ठरण्याची शक्यता आहे.


