मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (३० डिसेंबर) संपली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी (वंचित) युतीत मोठा गोंधळ उडाला आहे. काँग्रेसने मोठ्या मनाने वंचितला ६२ जागा सोडल्या होत्या, तर स्वतः १५०+ जागांवर लढणार होते. मात्र, मुदत संपल्यानंतर समोर आले की, वंचितने या ६२ पैकी फक्त ४६ जागांवरच उमेदवारी अर्ज भरले. १६ जागांवर उमेदवारच न मिळाल्याने अर्ज भरले नाहीत.
वंचितची मुंबईत फारशी संघटनात्मक ताकद नसल्याने हे अपयश आले. विशेष म्हणजे, वंचितने ही बाब काँग्रेसला मुदत संपेपर्यंत कळवली नाही. परिणामी, काँग्रेसला या १६ जागांवर आपले इच्छुक उमेदवार उतरवता आले नाहीत. या १६ पैकी काही जागांवर काँग्रेसची चांगली पकड आहे, तरीही युतीधर्म पाळत त्या जागा सोडल्या होत्या. आता काँग्रेसला बंडखोर (अपक्ष) उमेदवारांना अनौपचारिक पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. पक्षाकडून बंडखोरांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचितला जागा देऊन युती मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे अपयश युतीत मिठाचा खडा टाकणारे ठरले आहे. १९९९ नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात लढत आहे.
काँग्रेस लढवत असलेल्या प्रमुख महापालिकांतील जागा
मुंबई : १६७ (वंचितसोबत युती)
ठाणे : १०१
पुणे : १००
पिंपरी-चिंचवड : ६०
छत्रपती संभाजीनगर : १००
स्वबळावर लढत असलेल्या महापालिका
नागपूर
अकोला
अमरावती
चंद्रपूर
इतर
लातूर : वंचितला ५ जागा सोडल्या, उर्वरित काँग्रेस.
नांदेड : वंचितला २० जागा, उर्वरित काँग्रेस.
या घटनेमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या युती आणि महायुतीला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता आहे. १५ जानेवारीला मतदान असून, राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा आहे.


