Asaduddin Owaisi on Sharad Pawar: लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय भविष्याबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ सध्या उपलब्ध नसल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यसभेच्या निवडणुकांदरम्यान मोठा ‘तमाशा’ पाहायला मिळेल, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या प्रचारसभेत बोलताना ओवेसी यांनी हा दावा केला.
ओवेसी म्हणाले, ‘शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मार्चपर्यंत आहे. त्यांच्या हातात सध्या सत्ता कुठे आहे? त्यांच्या युतीकडे आवश्यक तेवढे आमदार आहेत का? जर ते पुन्हा राज्यसभेत जाणार असतील, तर कसे जाणार? राज्यसभेत जाण्यासाठी संख्याबळाची गरज असते. तेव्हा पुढे काय होतं, तो तमाशा पाहाच,’ असंही ओवेसी म्हणाले.
दरम्यान, येणाऱ्या राज्यसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण अनेक दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ याच काळात संपत आहे. यामध्ये केंद्र सरकारमधील मंत्री तसेच विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. जर हे नेते पुन्हा निवडून आले नाहीत, तर त्यांना सरकार आणि पक्ष पातळीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ज्या प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, दिग्विजय सिंह, शरद पवार, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, बी. एल. बर्मा आणि जॉर्ज कुरियन यांचा समावेश आहे. तसेच प्रेमचंद गुप्ता, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाह, प्रियंका चतुर्वेदी, रामदास आठवले, रामगोपाल यादव, नीरज शेखर, राम जी, शक्ती सिंह गोहिल, अभिषेक मनु सिंघवी, थंबी दुराई, तिरुची शिवा आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांचाही कार्यकाळ संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


