मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष व चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, काही तासांत महत्त्वाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन्ही याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात सकाळी 11.30 वाजता शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित न्यायालयीन कामकाज पाहणार असून, त्यानंतर अरावली डोंगररांगा प्रकरणासाठी गठित विशेष खंडपीठात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होईल की उद्यावर ढकलली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद परस्पर समेटातून सुटण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली नाही, तोपर्यंत हे प्रकरण न्यायालयाच्या बोर्डवर राहणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले होते. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आता अंतिम सुनावणी होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.


