Ujjwal Nikam On Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात संशयाचे धुमारे फुटले आहेत. “विमानात सहा प्रवासी असताना पाचच मृतदेह कसे सापडले?” या आमदार अमोल मिटकरींच्या प्रश्नाने खळबळ उडवून दिली असतानाच, आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भाजप खासदार उज्ज्वल निकम यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या वादाला कायदेशीर आधार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
निकम यांच्या मते, विमानात सहा प्रवासी होते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. तांत्रिक माहितीशिवाय असे दावे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सुचवले. विमानातील इंधनाचे प्रमाण जास्त असल्याने भीषण आग लागली. यामुळे मृतदेह कोळशासारखे जळून खाक झाले, ही एक नैसर्गिक दुर्घटना असू शकते. या घटनेला विनाकारण वेगळी कलाटणी दिली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘कट’ सिद्ध करण्यासाठी पुरावा हवा
‘जर कोणाला हा घातपात वाटत असेल, तर कायद्याच्या भाषेत ‘कटाचा सिद्धांत’ मांडण्यासाठी प्राथमिक पुराव्यांची गरज असते. सध्या तरी तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही,’ असे निकम यांनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरींचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, आमदार अमोल मिटकरी आपल्या संशयावर ठाम आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत जळजळीत शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘दादा असा निरोप घेऊच शकत नाहीत. ज्यांनी हा घात केला आहे, त्यांच्या वंशाचा दिवा विझल्याशिवाय राहणार नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. मिटकरींच्या या दाव्यामुळे अजितदादांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.
तज्ज्ञांचे मत विरुद्ध राजकीय शंका
एकीकडे उज्ज्वल निकम या घटनेकडे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पाहत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याला राजकीय षडयंत्र मानत आहेत. या दोन भिन्न प्रवाहांमुळे बारामती विमान अपघाताचे गूढ अधिकच वाढत चालले आहे.


