Plane Crash Controversy: माजी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणाला ‘राजकीय कटाचे’ वळण दिले आहे. ‘भाजपच्या घोटाळ्यांची फाईल उघडण्याची भाषा केल्यानंतर अवघ्या १० दिवसांत दादांचा मृत्यू होणे हे केवळ योगायोग असू शकत नाही,’ असे म्हणत राऊत यांनी थेट सत्ताधाऱ्यांकडे संशयाची सुई वळवली आहे.
१० दिवसांचे ते ‘रहस्य’ काय?
संजय राऊत यांनी या घटनेचा क्रम लावताना गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, १५ जानेवारी रोजी अजित पवारांनी भाजपनेते भ्रष्टाचारात अडकल्याची फाईल आपल्याकडे असल्याचे जाहीर केले होते. या विधानानंतर बरोबर १० व्या दिवशी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ही घटना आपल्याला ‘जस्टिस लोया’ प्रकरणाची आठवण करून देते, असे सांगत राऊत यांनी याला ‘गुड’ मृत्यू म्हटले आहे. विमानात सहा प्रवासी असताना केवळ पाचच मृतदेह कसे सापडले? सहावी व्यक्ती कोण होती? आणि जर सर्व मृतदेह जळून खाक झाले होते, तर अजितदादांकडे असलेली ती कागदपत्रे कशी काय सुरक्षित राहिली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ती फाईल बारामतीला सुरक्षित स्थळी नेली जात होती का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
‘मराठमोळा पक्ष आता गुजराती व्यापाऱ्यांच्या हाती’
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरही राऊतांनी प्रहार केला. ‘ज्या पक्षाचा चेहरा अस्सल मराठमोळा होता, तो आता शाह, मोदी आणि पटेल यांच्या दावणीला बांधला गेला आहे. भाजपची ही ‘गिळंकृत’ करण्याची वृत्ती महाराष्ट्राची अस्मिता संपवणारी आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
फडणवीसांवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, ‘अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसावा, म्हणूनच कदाचित त्यांनी विलिनीकरणाच्या हालचाली गुप्त ठेवल्या असतील. आज दादा उत्तर द्यायला हयात नाहीत, याचा अर्थ असा नाही की त्यांच्या नावावर काहीही खोटे दावे खपवून घेतले जातील.’


