Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली असून, अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खासगी सचिव अविनाश सोलवट यांची तब्बल ४ तास चौकशी केली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, २७ जानेवारीची रात्र आणि २८ जानेवारीच्या नियोजित दौऱ्याबाबत सीआयडीने अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारून माहिती गोळा केली आहे.
तपासाचा रोख: घातपात की तांत्रिक चूक?
सीआयडीच्या या चौकशीत प्रामुख्याने दौऱ्याच्या नियोजनावर भर देण्यात आला. बारामती दौऱ्याची आखणी नेमकी कोणी केली आणि ऐनवेळी कार्यक्रमात काही बदल झाले होते का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. तसेच २७ जानेवारीच्या रात्री पवारांच्या निवासस्थानी दौऱ्याबाबत नेमकी कोणाशी चर्चा झाली, याचीही माहिती घेण्यात आली. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी तांत्रिक तपासणीत काही त्रुटी होत्या का किंवा सुरक्षेत काही हलगर्जीपणा झाला होता का, या कोनातूनही सध्या तपास सुरू आहे.
खासदार बजरंग सोनवणेंचा ‘बॉम्बस्फोटा’चा संशय
या अपघाताला आता राजकीय वळण मिळाले असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. उपलब्ध व्हिडिओंचा दाखला देत त्यांनी हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. “विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत त्याचा स्फोट झाला, मग विमानात बॉम्ब होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोनवणे यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, या भीषण घटनेमागे एखादे मोठे षडयंत्र तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता
राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यामुळे सीआयडीवर निष्पक्ष तपास करून सत्य बाहेर काढण्याचे मोठे दडपण आहे. अविनाश सोलवट यांच्या चौकशीतून समोर येणारे धागेदोरे आणि तांत्रिक तपासाचे अहवाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी देऊ शकतात. घातपाताचा संशय खरा ठरल्यास हे प्रकरण राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे संशयास्पद मृत्यू प्रकरण ठरू शकते.


