Delhi Terror Attack : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाचे धागेदोरे थेट पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’शी (JeM) जुळले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या खुलाशामुळे सीमेपलीकडून चालणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर ऐरणीवर आला असून पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड झाला आहे.
UN च्या ३७ व्या अहवालातील धक्कादायक खुलासे:
लाल किल्ल्यावरील ज्या हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्याची जबाबदारी खुद्द जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. जैश आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटना आता अस्तित्वात नसल्याचा दावा पाकिस्तान सातत्याने करत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालाने पाकिस्तानचे हे दावे पूर्णपणे खोडून काढले आहेत. मसूद अझहरने दहशतवादाचा विस्तार करण्यासाठी ‘जमात-उल-मुमिनत’ नावाची महिला शाखा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून महिलांमध्ये कट्टरता पसरवणे आणि दहशतवादासाठी रसद पुरवण्याचे काम सुरू आहे.
काश्मीरमधील हल्ल्यांचाही उल्लेख
अहवालात केवळ दिल्लीच नव्हे, तर एप्रिल २०२५ मध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचाही संदर्भ देण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) ने घडवून आणला होता, जी प्रत्यक्षात लष्कर-ए-तैयबाचीच एक उपशाखा (प्रॉक्सी) असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जैशच्या सक्रियतेवरून जागतिक मतभेद
जैश-ए-मोहम्मदच्या सद्यस्थितीबद्दल काही सदस्य देशांमध्ये मतभेद असले, तरी भारताने पुरवलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे ही संघटना आजही सक्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. २८ जुलै २०२५ रोजी भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली होती.


