इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेच्या हिताची विचारधारा आजच्या आधुनिक युगातही मार्गदर्शक ठरत आहे. महाराजांनी गनिमी कावा, धाडस, संयम, दूरदृष्टी, जनतेचा विश्वास व 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रजाहित दक्ष राजा होते, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. 19) काढले.
बावडा येथे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास 396 व्या जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील व निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती करण्यात आली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करावी. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापनाची गनिमी कावा सारखी महत्त्वाची सूत्रे आजही जगामध्ये ‘मॅनेजमेंट गुरु’ म्हणून अभ्यासली जात आहेत. शिस्तबद्ध सैन्य व उत्कृष्ट प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर त्यांनी सामर्थ्यशाली स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी राबविलेल्या धोरणांमुळेच आजही समाजिक एकोपा दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समाजाला कायमच प्रेरणा व स्फूर्ती देत राहील, असे गौरोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
तसेच भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी भव्य शिवजयंती व शोभायात्रेचे उत्कृष्ट नियोजन केलेबद्दल श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी व संचालक मंडळ, प्राचार्य डी. आर. घोगरे व सहकाऱ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. यावेळी डॉ.लक्ष्मण आसबे, जि. पं. सदस्या निर्मला मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, झांज पथक तसेच लाठी-काठी या मर्दानी खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.
इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान
यावेळी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 व पंचायत समितीच्या 16 अशा नवनिर्वाचित 24 सदस्यांचा सन्मान श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी व बावडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयत हिताच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व सदस्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहनही यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.


