Pankaja Munde: राजकारणातील माझी इनिंग संपल्यानंतर मी भगवी पताका हाती घेईन आणि हरिभक्त पारायण (हभप) म्हणून सेवा करेन, असे सूचक आणि तितकेच भावनिक विधान राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील गणेशानंद गडावर आयोजित नारळी सप्ताहात त्या बोलत होत्या. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘तुमच्या प्रेमाची उतराई कातड्याचे जोडे करूनही होणार नाही’
लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळात कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाचा उल्लेख करताना पंकजा मुंडे कमालीच्या भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पराभवानंतर काही भावांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या, हे दुःख मोठे आहे. जनतेचे माझ्यावर इतके प्रेम आहे की, मी माझ्या स्वतःच्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले, तरी तुमच्या उपकारांची फेड होणार नाही.”
भगवान गडावरील मंदिरासाठी पदराने काढली दृष्ट
भगवान गडावर उभारण्यात येत असलेल्या माऊली मंदिरासाठी ज्या देणगीदारांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली, त्यांचे पंकजा मुंडे यांनी जाहीर आभार मानले. इतकेच नव्हे तर, या दातृत्वाने भारावून जात त्यांनी भर कार्यक्रमात देणगीदारांची आपल्या पदराने दृष्ट काढली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वारसा आणि संस्कार कधीही पुसू देणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा दिली.
परळीत ‘रामराज्या’चा संकल्प
रामनवमीच्या निमित्ताने परळीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः पाळणा हलवून श्रीरामाला अभिवादन केले. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने आदर्श राज्यकारभार केला, तसेच न्याय आणि सत्याचे ‘रामराज्य’ माझ्या परळीत यावे, हीच चरणी प्रार्थना आहे, असे त्या म्हणाल्या.


