भिगवण: शासनाने उजनी जलाशयात सोडलेल्या प्रमुख कार्प जातीच्या एक किलोच्या आतील मासे खरेदी-विक्रीवर बंदीचा निर्णय भिगवण येथील मासळी बाजारातील आडतदार व होलसेल व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जलसंपदा विभागाने बंदी घातलेल्या वडाप व पंड्याच्या जाळ्यावर कारवाईचे सत्र चालू केले आहे. याच वेळी आडतदार व व्यापाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेले उजनी जलाशय सध्या बेकायदेशीर (अवैध) मासेमारीमुळे धोक्यात आले आहे. केवळ चिलापी, थाय मांगूर, सकर माशांचे सर्वत्र साम्राज्य पसरले आहे. धरणातील चवदार मासे दुर्मिळ व नष्ट झाले आहेत. रोजगारनिर्मिती व घटलेले मत्स्य उत्पादन पूर्ववत होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धोरणात्मक निर्णय घेत २०२४ पासून उजनी धरणात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे संवर्धन होण्यासाठी कोणत्याही आकाराचे वडाप, पंड्याने मासेमारीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीदेखील मुजोर फिशमाफिया मत्स्यबीज व लहान मासे मारून त्याच्या तस्करीचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही.
दरम्यान, इंदापूर व भिगवण या मासळी खरेदी-विक्रीच्या सर्वांत मोठ्या बाजारातदेखील रोहू, कटला, मृगल जातींचे लहान मासे विक्रीसाठी आणले जातात. ही बाब लक्षात घेऊन भिगवण आडतदार व व्यापाऱ्यांनी असे लहान मासे खरेदी किंवा विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक किलोच्या आतील रोहू, कटला, मृगल जातींचे मासे मारणे कायद्याने गुन्हा असल्याने व मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी असे मासे कोणीही खरेदी अथवा विक्री केल्यास संबंधित विभागाकडून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


