Satara Accident : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हृदयद्रावक अपघातात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली.
सडादाढोली येथील राजू झोरे (२५) आणि राणी झोरे (२३) यांचे लग्न अवघ्या दहा दिवसांपूर्वी झाले होते. संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन दोघेही दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. मात्र, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
येरफळे गावाच्या हद्दीत त्यांनी पुढे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे झोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


