नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण बचत अर्थात सेव्हिंग करत असतील. पण हीच सेव्हिंग करताना लहान गुंतवणूकदारांसाठी पैसे सुरक्षित राहणे ही काळजी असते. आपले कष्टाचे पैसे कुठे गुंतवावेत, जेणेकरून पैसे गमावण्याच्या भीतीशिवाय त्यांना भरघोस परतावा मिळू शकेल, यासाठी अनेक पर्यायांकडे लक्ष दिले जाते.
सुरक्षेच्या बाबतीत पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्हीही खूप सुरक्षित मानले जातात, कारण सरकार स्वतः हमी देते. शिवाय, परताव्याचीही हमी दिलेली असते. पीपीएफ (PPF), एनएससी (NSC) आणि एमआयएस (MIS) यांसारख्या पोस्ट ऑफिस बचत योजनांना भारत सरकारची सार्वभौम हमी असते. याचा अर्थ असा की, तुम्ही त्यात जमा केलेल्या पैशांची जबाबदारी सरकार स्वतः घेते. यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात, ज्यामुळे ते १००% जोखीममुक्त होते.
पोस्ट ऑफिस हे एकप्रकारचे सरकारचा भाग आहे, त्यामुळे दिवाळखोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही १ लाख रुपये जमा करा किंवा १ कोटी रुपये, तुमची संपूर्ण रक्कम परत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ज्यांना ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही टेन्शनशिवाय एकाच ठिकाणी ठेवायची आहे, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे.
बँक एफडी करावी का?
एसबीआय असो वा एचडीएफसी, एका बँकेत जमा केलेले तुमचे पैसे आरबीआयचा एक भाग असलेल्या डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) द्वारे संरक्षित असतात. जास्तीत जास्त ५ लाख रुपये पूर्णपणे सुरक्षित आणि विमा संरक्षित असतात.


