Food Poisoning: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे (Food Poisoning) एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे मुघल बिल्डिंग परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनीच्या घाटी गल्लीतील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री इतर नातेवाईकांसोबत जेवण केले. जेवणात आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तात्काळ जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान एकापाठोपाठ एक अशा चौघांचाही मृत्यू झाला.
- मृतांची ओळख:
अब्दुल्ला डोकाडिया (४० वर्षे) - नसरीन डोकाडिया (३५ वर्षे)
- आयशा डोकाडिया (१६ वर्षे)
- झैनब डोकाडिया (१३ वर्षे)
रहस्य अद्याप कायम
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही विषबाधा जेवणातून झाली असावी असा संशय आहे. “बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने प्रकृती बिघडली,” असा जबाब एका पीडिताने मृत्यूआधी दिला होता. मात्र, केवळ कलिंगड आणि बिर्याणीच्या सेवनाने एकाच वेळी चौघांचा मृत्यू कसा झाला, याबाबत गूढ कायम आहे. पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. “शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि तांत्रिक कारण स्पष्ट होईल,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.


