NCP Crisis : बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून, तब्बल ९० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी ॲड. नाझेर काझी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलं आहे.
ॲड. नाझेर काझी हे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र, यावेळी पक्षाकडून त्यांना संधी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त बुलढाण्यात आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच नाराज पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत थेट राजीनामे सादर केले. या घडामोडींमुळे नियोजित बैठक रद्द करण्याची वेळ पक्ष नेतृत्वावर आली.
या सामूहिक राजीनाम्यांनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आणखी काही पदाधिकारीही राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, आगामी काळात ही नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पक्ष नेतृत्व ही नाराजी कशी हाताळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


