RB Choudary : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माता आर.बी. चौधरी यांचं भीषण रस्ते अपघातात निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरधाव वेगातील कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर येथे त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही.
आर.बी. चौधरी हे दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत मानाचे नाव होते. त्यांनी ‘सुपर गुड फिल्म्स’ या बॅनरखाली तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये १०० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक दिग्गज निर्माता गमावला आहे. ते लोकप्रिय तमिळ अभिनेता जीवा यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे जीवा आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१९८८ साली चित्रपट निर्मितीत प्रवेश
आर.बी. चौधरी यांनी १९८८ मध्ये चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘Pudhu Vasantham’ प्रचंड गाजला. या चित्रपटासाठी त्यांना तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
त्यांनी अनेक नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांना संधी दिली. दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्या पहिल्या चित्रपटालाही त्यांनी पाठबळ दिलं होतं.
अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती
आर.बी. चौधरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘लव्ह टुडे’, ‘जॉली’, ‘मिस्टर रोमियो’, ‘एसीपी शिवा’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘मरिशन’ हा जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
आर.बी. चौधरी यांच्या निधनामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात असून, अनेक कलाकार आणि निर्माते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ६ मे रोजी चेन्नई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.


