Pune News: वारकरी संप्रदायातील अंतर्गत वादातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सुमारे १० ते १५ समर्थकांनी आळंदी परिसरात लवांडे यांची गाडी अडवून हा प्रकार केला. या हल्ल्यानंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर अटकेची कारवाई होईपर्यंत सत्याग्रह करण्याचा पवित्रा घेतला आहे.
नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे आळंदी येथे एका दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आले होते. प्रवचन संपवून ते पुण्याकडे परतत असताना, निर्जन स्थळी दोन-तीन गाड्यांमधून आलेल्या टोळीने त्यांचा रस्ता अडवला. हल्लेखोरांनी लवांडे यांना गाडीतून ओढून बाहेर काढले आणि त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या. विकास लवांडे यांनी आरोप केला आहे की, या जमावातील दोन जणांकडे बंदुका होत्या आणि त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आजूबाजूला लोक जमा होऊ लागताच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
‘वारकरी विरुद्ध मनुवादी’ संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायामध्ये ‘कट्टर हिंदुत्ववादी’ आणि ‘धारकरी’ विचारांच्या लोकांनी शिरकाव केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. संप्रदाय ‘हायजॅक’ करणाऱ्या ४० कथित घुसखोर महंतांची नावे जाहीर करण्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता. विकास लवांडे यांनी सातत्याने वारकरी चळवळीतील ‘मनुवादी घुसखोरी’वर पुराव्यांसह भाष्य केले होते. याच रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
रोहित पवारांचा सरकारवर प्रहार
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्ञानोबा-तुकोबांना ज्या मनुवादी वृत्तीने छळले होते, त्याच वृत्तीचे लोक आज लवांडेंवर हल्ले करत आहेत. सरकारने तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात आणि लवांडे यांना पोलीस संरक्षण द्यावे. अन्यथा, हा हल्ला सत्तेच्या आशीर्वादाने झाला आहे असे आम्ही समजू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुढील पाऊल
विकास लवांडे सध्या पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून असून, संग्राम भंडारे व त्यांच्या साथीदारांना अटक होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.


