Rain Update : राज्यातील वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता मान्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हवामान विभागाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत कमाल तापमान ३४ अंशांवर राहण्याची शक्यता असून, दिवसभर ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात रविवारी पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा, खारेगाव, घोडबंदर रोड आणि मुंब्रा परिसरात जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अनेक दिवसांच्या तीव्र उकाड्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. परतूर तालुक्यातील फुलवाडी येथे महिला शेतकरी यशोदा आब्दल यांची दीड एकरावरील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली.
तसेच एका महिलेला झाडाची फांदी अंगावर पडून गंभीर दुखापत झाली आहे. अनेक ठिकाणी सोलर पॅनेल्सचे नुकसान झाले असून पशुधनही दगावल्याची माहिती समोर आली आहे.
घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील अनेक गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी ऐन आंबा हंगामात पाऊस आल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काही भागांत विजेचा लपंडावही सुरू झाला आहे.
सोलापूर शहरात शनिवारी रात्री अचानक पावसाने दमदार हजेरी लावली. तापमान ४२ ते ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने हैराण झालेल्या नागरिकांनी या पावसाचा आनंद घेतला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यात मात्र उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. २५ मेपासून ‘नवताप’ कालावधी सुरू होत असून, २ जूनपर्यंत तापमान ४६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


