नवी दिल्ली : बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यास विमा कंपन्या उत्तरदायी नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सुसाट गाडी चालवताना मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाकडून भरपाईचा दावा करण्यात आला होता.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून करण्यात आलेली ८० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी अमान्य केली. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने गतवर्षी २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला. उच्च न्यायालयाने मृताच्या कायदेशीर उत्तराधिकाऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे संबंधित कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेदेखील ही याचिका फेटाळून लावली.
या प्रकरणानुसार १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश नामक व्यक्तीचा प्रवासादरम्यान कार उलटल्याने मृत्यू झाला होता. परंतु संबंधित प्रकरणात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे कार चालवण्यात आल्याचे आढळून आले. दुर्घटना रवीशच्या निष्काळजीपणामुळे घडली. त्यामुळे त्याचे कायदेशीर उत्तराधिकारी कुठल्याही प्रकाराच्या भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असे करणे म्हणजे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या चुकीच्या गोष्टीसाठी भरपाई देण्यासारखे होईल, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले होते.


