पुणे : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती राज्यभर साजरी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. हिंदू धर्मातील दशावतारांपैकी तिसरा अवतार मानल्या जाणाऱ्या वराह भगवानाच्या जयंतीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्याचे सांगत राणे यांनी 25 ऑगस्ट रोजी हा उत्सव अधिकृतपणे साजरा करण्याची विनंती केली.
मात्र, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक पलटवार करत राणेंना चिमटे काढले. “नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी,” असा उपरोधिक सल्ला अंधारे यांनी दिला आहे.
नितेश राणेंची मागणी
नितेश राणे यांनी गेल्या काही काळात हिंदुत्त्ववादी भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वराह जयंती (भाद्रपद शुद्ध द्वितीया, 25 ऑगस्ट) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा उत्सव आहे. वराह भगवान हे वसुंधरेचे संवर्धक आणि रक्षक असून, त्यांच्या पूजनाने समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. त्यामुळे राज्य सरकारने खालील बाबींवर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
– 25 ऑगस्ट हा दिवस वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा.
– जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत.
– शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाच्या इतिहास आणि संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत.
– मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि भक्तीचे कार्यक्रम आयोजित करावेत.
सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार
नितेश राणे यांच्या या मागणीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपरोधिक टीका केली. त्या म्हणाल्या, “नितेश राणे यांना त्यांच्या पूर्वजांची आठवण राहिली, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या विधानांना नेहमीच गांभीर्याने घेतलं पाहिजे. वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी वराह अवतारात हा उत्सव साजरा करावा.
ज्याप्रमाणे दहीहंडीला गोविंदा टोळ्या गोविंदाच्या वेशात वावरतात, त्याचप्रमाणे नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वराह अवतार धारण करून हा दिवस साजरा करावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने वराह जयंती साजरी होईल.” अंधारे यांनी राणेंना लक्ष लक्ष शुभेच्छा देत हा खोचक टोला लगावला.
राजकीय वातावरण तापलंनितेश राणे यांच्या वराह जयंतीच्या मागणीने आणि सुषमा अंधारे यांच्या प्रत्युत्तराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राणे यांची हिंदुत्त्ववादी भूमिका आणि अंधारे यांचा उपरोधिक पलटवार यामुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. राणे यांनी यापूर्वीही आपल्या आक्रमक वक्तव्यांनी आणि हिंदू धर्माच्या मुद्द्यांवरून लक्ष वेधलं आहे. दुसरीकडे, अंधारे यांचा हा टोला राणे यांच्या मागणीला हलक्या पद्धतीने प्रत्युत्तर देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.


