Sanjay Raut on Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे, केंद्राकडून पर्याप्त निधी मिळावा आणि एकरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी, असेही सुचवले होते. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राने पीएम केअर फंडसारखा फंड स्थापन करण्याची परवानगी दिली होती. कोरोनाकाळात त्या फंडात तब्बल 600 कोटी जमा झाले, परंतु त्या रकमेतील एक रुपयाही वापरता आला नाही, असा आरोप त्यांनी केला.
यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला. राऊत यांनी म्हटलं आहे की, भाजप नेत्यांचं हे मूर्खपणाचं वक्तव्य आहे. मुख्य मुद्दा शेतकऱ्यांचा आहे आणि ते मुद्दा बदलतात. कोविड काळातील महाराष्ट्रातील व्यवस्था उत्तम होती. त्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. यूपी-बिहारसारख्या भाजपशासित राज्यांमध्ये मात्र अराजकता होती. गंगेच्या किनाऱ्यावर कोविडकाळात बेवारस प्रेतं वाहत होती, हे जगाने पाहिलं. त्यामुळे फडणवीस यांनी महाराष्ट्रावर आरोप करण्याआधी ते चित्र बघावं.
हेही वाचा – मोठी बातमी..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार? कोणी केला दावा
दरम्यान संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘भाजपची कायमची सवय आहे की स्वतःची चूक लपवून इतरांवर बोट दाखवायचं. प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, तीन-चार वर्षांपूर्वीच्या घटनेचा नाही. पीएम केअर फंडात किती पैसे जमा झाले आणि महाराष्ट्रातून किती योगदान आलं, हे आम्हाला माहिती आहे. जर आम्ही ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मागितले, तर भाजप जुने विषय उकरतो. हे कुठलं धोरण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी फडणवीसांना थेट सुनावत म्हटलं, ‘तुम्ही प्रशासन चालवायला शिका. पंजाब सरकारकडून धडा घ्या. त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत दिली आहे. मात्र, तुम्ही मात्र सतत भूतकाळाचा हवाला देता. 1940-50 च्या काळापर्यंत जाऊन जुने विषय काढून काय उपयोग? राज्यकारभार म्हणजे सूडाचं राजकारण नाही. तुम्हाला जर प्रशिक्षण हवं असेल, तर आम्ही माणसं पाठवू. वर्तमानकाळात बोला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, असा सल्लाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.


