नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात UPI अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल येणार आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) ने 1 ऑक्टोबर 2025 पासून P2P (पीअर-टू-पीअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ फीचर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करणे आणि वाढत्या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालणे आहे. हे फीचर कोणत्याही युजर्सला दुसऱ्या UPI युजर्सला पैशाची रिक्वेस्ट पाठवण्याची परवानगी देते. समोरील व्यक्ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताच आणि त्याचा UPI पिन टाकताच रक्कम हस्तांतरित केली जाते. मात्र, याचा वाढता वापर पाहता स्कॅमर्सच्या निशाण्यावर गेले. फसवणूक करणाऱ्यांनी बनावट रिक्वेस्ट पाठवून लोकांना फसवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आर्थिक नुकसानीच्या अनेक घटना घडल्या.
दरम्यान, याबाबतचा निर्णय घेताना NPCI ने स्पष्ट केले की, ही बंदी फक्त P2P कलेक्ट रिक्वेस्टवर लागू होईल. एक ऑक्टोबरनंतरही व्यापारी या सुविधेचा वापर करू शकतील. व्यापाऱ्यांसाठी केवायसी नियम कडक करण्याची योजना आहे, जेणेकरून फसवणूक आणखी कमी करता येईल.


