Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: मराठी विनोदी काव्यसृष्टीला आपली स्वतंत्र ओळख देणारे, ‘मिर्झा एक्सप्रेस’साठी प्रसिद्ध असलेले कवी आणि हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे अमरावतीत आज (शुक्रवार, २८ नोव्हेंबर) पहाटे ६.३० वाजता निधन झाले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अमरावतीत वास्तव्य
नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव असले तरी, ते अमरावतीतील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या निवासस्थानी राहात होते. त्यांच्या मागे पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि दोन कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे. दुपारी दोननंतर अमरावतीतील ईदगाह कब्रस्तानात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – अभिनेत्री फातिमा सना शेखने सांगितला बालपणीचा ‘तो’ किस्सा; पहिल्यांदाच बोलली क्रशबद्दल…
विदर्भ-मराठवाडा ते महाराष्ट्रभर, जिथे काव्यमैफल तेथे ‘मिर्झा एक्सप्रेस’ची लोकप्रियता होती. ६ हजारांहून अधिक काव्यवाचनाचे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. वीस स्वतंत्र काव्यसंग्रहांनी साहित्यजगत समृद्ध करणारे डॉ. मिर्झा हे विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्वही होते. त्यांची बोली, त्यांचा धडाका, आणि पोट धरून हसवणारे विनोद यामुळे प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांवर जणू हास्याचा वर्षाव होत असे. ग्रामीण भाषेतील तडका, सामाजिक विषयांवरची मार्मिक टिप्पणी, आणि सहजसुंदर मांडणी यांमुळे त्यांची शैली अद्वितीय बनली.


